प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन; तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर मिळणार पारितोषिके
पुणे : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्पादन वाढवावे, तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कृषी विभागातर्फे खरीप हंगाम २०२६-२७ राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ खरीप पिकांचा समावेश आहे. सर्वसाधारण तसेच आदिवासी गटातील शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर घेण्यात येणार असून, उत्पादनाच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये, जिल्हास्तरावर १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये, तर राज्यस्तरावर ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे व स्वतः शेती करणे आवश्यक आहे. भातासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आहे.
अर्जासाठी फार्मर आयडी, प्रवेश शुल्काची पावती, आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र आणि बँक खात्याची माहिती आवश्यक आहे. कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील ‘पीक स्पर्धा नोंदणी’ या सुविधेद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. अधिकाधिक प्रयोगशील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.











