पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शहरासाठी महत्त्वाचा असलेला उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग अर्थात ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्याचबरोबर प्रस्तावित ‘पाताळलोक’ भुयारी मार्ग प्रकल्पाच्या सर्वेक्षणालाही गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एचसीएमटीआर, पीएमआरडीए रिंगरोड आणि प्रस्तावित बोगदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
३९ वर्षांपासून प्रकल्प रखडलेला
पुणे महापालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यात एचसीएमटीआरची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र, भूसंपादन, निधीची कमतरता, प्रशासकीय समन्वयाचा अभाव आणि निविदा प्रक्रियेतील अडचणींमुळे तब्बल ३९ वर्षांनंतरही प्रकल्प पूर्ण झालेला नाही.
काही वर्षांपूर्वी प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, प्राप्त निविदा अंदाजित खर्चापेक्षा सुमारे ४५ टक्के अधिक दराची असल्याने ती रद्द करण्यात आली होती.
शासकीय जमीन मोफत हस्तांतरित होणार
प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीपैकी सुमारे ३० टक्के जमीन राज्य सरकारच्या विविध विभागांच्या मालकीची आहे. ही जमीन पुणे महापालिकेला मोफत हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
उर्वरित खासगी जमिनीच्या भूसंपादनासाठी रोख मोबदला देऊन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच प्रकल्पासाठी स्वतंत्र आर्थिक आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वाहतूक कोंडीत २५ ते ३० टक्के घट अपेक्षित
सुमारे ४३.६० किलोमीटर लांबीचा एचसीएमटीआर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक कोंडीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे शहरातील विविध मेट्रो मार्गिका, प्रमुख रस्ते आणि महामार्ग एकमेकांशी जोडले जातील.
शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे प्रमुख रस्त्यांवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, एचसीएमटीआर आणि मेट्रो मार्ग काही ठिकाणी एकमेकांना छेदत असल्याने दोन्ही प्रकल्पांमध्ये योग्य समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
‘पाताळलोक’ प्रकल्पांतर्गत तीन बोगदे
पुण्यातील भविष्यातील वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित ‘पाताळलोक’ प्रकल्पांतर्गत तीन महत्त्वाचे बोगदा मार्ग विचाराधीन आहेत.
- भोसरी–उंड्री–पुरंदर नवीन विमानतळ मार्ग: एकूण ३६ किलोमीटर; त्यापैकी २६ किलोमीटर बोगदा आणि १० किलोमीटर उन्नत मार्ग.
- रामनदी–भूगाव–राजाराम पूल मार्ग: सुमारे आठ किलोमीटरचा बोगदा.
- तळजाई टेकडी–पद्मावती–हिंगणे मार्ग: सुमारे १.६५ किलोमीटरचा बोगदा.
या मार्गांचे भूगर्भशास्त्रीय आणि तांत्रिक सर्वेक्षण तज्ज्ञ संस्थांकडून केले जाणार आहे. खडकांची रचना, भूजल पातळी, वायुवीजन, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था अशा सर्व बाबींचा अभ्यास झाल्यानंतर मार्गांचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाईल.
पुणेकरांना मोठ्या दिलाशाची अपेक्षा
एचसीएमटीआर, पीएमआरडीए रिंगरोड आणि बोगदा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुण्यातील अंतर्गत आणि बाह्य वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यासह प्रदूषण कमी होण्याचीही अपेक्षा आहे.
मात्र, भूसंपादन, निधी, आवश्यक मंजुरी आणि बांधकामाचे नियोजन निश्चित वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान असेल. अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर प्रत्यक्षात किती वेग मिळतो, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.











