अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ६९७ कोटी ८१ लाख २५ हजार १३९ रुपयांचा कर्जमाफीचा निधी वर्ग करण्यात आला आहे. कर्जमाफीच्या निधी वितरणात अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कर्जमुक्तीच्या लाभ वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६५ हजार ६५६ शेतकरी सभासदांना ६२२ कोटी ७४ लाख रुपयांचा, तर राष्ट्रीयीकृत बँकांमधील ६ हजार ९०३ शेतकऱ्यांना ७५ कोटी ७ लाख २५ हजार १३९ रुपयांचा लाभ मिळाला आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीककर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने बँकांना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नव्याने आर्थिक बळ मिळणार आहे.
१ लाख १५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण
जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार ७११ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत १ लाख ३२ हजार ५९१ पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यापैकी १ लाख १५ हजार ६९२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आधार प्रमाणीकरणाच्या संख्येतही अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नसल्यास ती तातडीने पूर्ण करावी. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
फार्मर आयडी काढण्याचे आवाहन
जिल्ह्यातील ८ हजार ६३६ शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही. संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यावा. तसेच मयत खातेदारांच्या प्रकरणांमध्ये वारसांनी संबंधित विकास संस्था किंवा बँकेकडे वारस नोंद करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











